Kalyan – Dombivli : कल्याण डोंबिवलीत महायुतीचा तिढा सुटणार का? शिवसेना-भाजपनं १३ नेत्यांना दिली मोठी जबाबदारी
आगामी २०२५ – २६ मधील कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना युतीकडून महत्त्वाचं संघटनात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे. निवडणुकीतील नियोजन, जागावाटप आणि दोन्ही पक्षांतील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी भाजप–शिवसेना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत एकूण १३ पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या समितीमार्फत आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या, मात्र बदलापूर आणि अंबरनाथ येथील निवडणुकांतील विजयानंतर भाजप अधिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या कल्याण–डोंबिवली महापालिकेत भाजपने पाच वर्षांचे महापौर पद आणि ८३ नगरसेवकांच्या जागांची मागणी केल्याने युतीत अंतर्गत तणाव वाढल्याचं दिसत आहे.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की, ही समन्वय समिती प्रामुख्याने युतीबाबतच्या चर्चांसाठी स्थापन करण्यात आली आहे. युती झाली तर तिचा फॉर्म्युला काय असावा आणि युती झाली नाही तरी पुढील रणनीती काय असावी, यावर चर्चा सुरू आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार पक्षाच्या 80 पेक्षा अधिक जागा निवडून येतील असा दावा करण्यात आला आहे. तसेच गेल्या टर्ममध्ये भाजपला महापौर पद न मिळाल्यामुळे यावेळी संपूर्ण पाच वर्षांचे महापौर पद भाजपला देण्यात यावे, अशी ठोस भूमिका पक्षाने मांडली आहे.
या बाबत भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी भाजपच्या समितीत पाच सदस्य आणि दोन निमंत्रित सदस्यांचा समावेश असून शिवसेनेच्या समितीसोबत दोन बैठका झाल्या आहेत. पहिल्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या सध्याच्या नगरसेवक संख्येवर चर्चा झाली, तर दुसऱ्या बैठकीत भाजपने ८३ जागांची अधिकृत मागणी केली आहे. तसेच २०१५ मध्ये भाजपला महापौर पद न मिळाल्यामुळे त्या आधारे आता पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ भाजपला मिळावा हा प्रस्ताव शिवसेनेकडे आम्ही ठेवला असून शिवसेनेला तो मान्य ही असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी समन्वय समितीच्या स्थापनेचे स्वागत करत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत शिवसेनेकडे अंदाजे ७० ते ७२ नगरसेवक, तर भाजपकडे ५३ ते ५७ नगरसेवक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतिम निर्णय हा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येईल आणि तो सर्वांना मान्य असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकीकडे वरिष्ठ पातळीवर समन्वय वाढवण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी दुसरीकडे तळागाळातील कार्यकर्त्यांकडून युतीविरोधात दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात युतीचा अंतिम निर्णय काय होणार, याकडे संपूर्ण कल्याण डोंबिवलीचे लक्ष लागले आहे.
